गोग्रासवाडी (डोंबिवली) १०
गोग्रासवाडीचा सुवर्णकाळ
चाळीतल्या आठवणी अनंत आहेत. जन्मापासून तिथेच असल्यामुळे सर्व मित्रमंडळी ही तिथलीच, मैत्री तिथलीच आणि सत्ता ही तिथेच होती. मला १९७१ च युद्ध आणि ते दिवस अजून आठवतात, हो मी अगदी पाचच वर्षांचा होतो. तरीही पूर्ण आठवण आहे त्यातल्या त्या पंधरा एक दिवसातील प्रत्येक दिवसाची.
दररोज साधारण ७ ला शेवटचं बातमीपत्र सादर व्हायच रेडिओवरून. सर्व पुरुष मंडळी कामावरून पोचलेली असायची. बहुतेक युद्ध परिस्थितीमुळे लवकर सोडत असतील. हे बातमीपत्र झालं की नगरपालिकेचा सायरन वाजवायचा. नन्तर पूर्ण डोंबिवलीमधले लाईट्स जायचे. सर्व चाळीतील सर्वच्या सर्व माणस एकत्र जमायचो. खूप आधार वाटायचा त्या स्थितीत सर्वांच्या असण्याचा.
आमच्या शेजारी भडकमकर होते त्यांच्या घरी त्यांची वयस्क आई म्हणजेच आजी होत्या. चाळीत सर्वात ज्येष्ठ त्याच. लाईट्स गेले की सर्व जण एकत्र जमून फक्त गप्पा मारत होतो. कारण भीतीमय वातावरण असायचं, युद्धामुळे. त्यात गप्पा म्हणजे तेवढाच बदल वातावरणात. त्या आजी आम्हा मुलांना बसवून जप करायला लावायच्या, भीती जाण्यासाठी. जप होता अर्थातच श्रीराम जयराम उय जयराम. आम्ही सर्व मुलं मिळून मांडी घालून एकत्र बसून हा जप करायचो. ५, १० मिनिटं.
इतर चाळीतील उत्साही मंडळी येणाऱ्या जाणाऱ्यांना वाट दाखवत. कारण सर्वत्र अंधार असायचा. पण अश्या वेळी कोणी टॉर्च वा तत्सम दिवा घेऊन येताना दिसला की काही खैर नसे त्या माणसाची. अगदी घरात सुद्धा दिवा लावायचा नाही. त्यात सर्व चाळी कौलारू त्यामुळे उजेड पाहून विमान येण्याची भीती असायची. त्यामुळे सख्त ताकीद असायची. एकदा गोग्रासवाडीतल्या सॅनेटोरीयम मध्ये ७ नन्तर साधारण ८, ८३० वाजले असावेत, उजेड दिसत होता. त्यावेळी आसपासच्या सर्व चाळीतील उत्साही सदस्य त्यांच्या घरी जाऊन, अगदी भांडून, दिवा बंद करायला सांगून, नव्हे त्याची अंमलबजावणी करून आले.
एकदा रस्त्यावरून जाणारा एक सद्गृहस्थ चक्क टॉर्च घेऊन चालले होते. त्या माणसाला आम्ही सर्वांनी आरडा ओरडा करून टॉर्च विझवायला लावली. आमची चाळ फ्रंटवर म्हणजेच मेन रोड वर असल्यामुळे हे सर्व बघण्याचा योग येत असे. एरवी आतल्या चाळीना हा फायदा नसे. एक दिवस तर बाका प्रसंग आला होता. लांब अंतरावर आकाशात तोफांचे गोळे दिसायला लागले आणि अशी हवा उठली की पाक विमानं मुंबईकडे येत आहेत आणि त्यांना घालवण्यासाठी आपल्या सैन्याने त्यांना विमानविरोधी तोफांच्या माऱ्याने परतवून लावलं. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा असाच प्रकार घडल्यावर आम्ही सर्व मुलं, चाळीतील पवार काकांच्या घरात पलंगाखाली लपून बसलो होतो, काही वेळ. नव्हे तर आम्हाला तस लपवण्यात आलं होतं. नन्तर ते गोळे दिसायचे बंद झाल्यावर आम्हाला बाहेर यायची परवानगी मिळाली.
अश्या अनेकांच्या आठवणी असतील, ७१ च्या युद्धातील.
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
१६/०८/२०१८
Comments
Post a Comment