गोग्रासवाडी (डोंबिवली) ६
दुसरं देऊळ हे श्रीदत्त दिगंबर यांचं. सुंदर साची छोटी पण प्रभावंत त्रीमुर्ती. हे मधलं देऊळ . या नदिरात दत्तजयंतीचा छान उत्सव व्हायचा. किंबहुना सर्वच उत्सव एकाच उत्साहाने साजरे व्हायचे गोग्रासवाडीत. प्रत्येक उत्सवाला वाडीतील सर्व लोक आवर्जून यायचे. कदाचित त्यावेळचे प्रश्न एवढे ज्वलंत नसावेत आणि लोकांची मन कलुषित नसावीत आता इतकी. आणि मुख्य म्हणजे मीडिया नसल्यामुळे राजकारण घरा घरात पोचलं नव्हतं.
दत्तमंदिरांनंतर शंकर आणि गणपती अस एक सामायिक मंदिर आहे. म्हणजे त्यावेळी होतं. कारण आता दत्तमंदिरांनंतर शनिदेवांचं मंदिर बांधलय मध्ये. या शंकराच्या मंदिरात छोटीशी छानशी संगमरवरी पिंड आहे शंकराची. आणि शेंदूरलेपित गणपतीची मूर्ती पण आहे. या मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव छान साजरा होत असे. अगदी पारंपरिक हर्षोल्हास के साथ. इथे महाशिवरात्रीला भांग मिळायची. त्यावेळी अस ऐकलं होतं भांग चढते , म्हणून मी एकदाही पिऊन बघितली नाही. म्हणजे अगदी हट्टाने पिणार नाही असं सांगून न पिता राहिलो. असो. एक मात्र आहे, अजूनही सर्व मंदिरातल्या मूर्ती त्याच आहेत आणि तिन्ही मंदिरात मूर्तीमागे टाईल्ससुद्धा त्याच आहेत , हे विशेष.
या मंदिरामागे एक विहीर आहे. तिला गुप्तगंगा अस नाव आहे म्हणजे ती अचानक प्रकट झाली आणि नन्तर बांधली गेली, अशी आख्ख्यायिका आहे. एक संगमरवरी दगड पण आहे त्या विहिरीत. त्यावर लिहिलंय नाव. विहीर छान दगडाने बांधल्ये आणि मध्ये मध्ये दगड बसवलेत उतरण्यासाठी आणि या विहिरीला रहाट पण होत आणि पूर्वी इथून लोक पाणी शेंदून नेताना आम्ही पाहिलंय.
या विहिरीच्या उजव्या हाताला शेताडी आहे म्हणजे शेत आहे त्या दोन शेतांमधून छोटी वाट आहे आणि ती वाट पुढे आताच्या जिजाऊनगर मध्ये येते. याच दोन शेतांच्या नन्तर त्यांना लागूनच अजून एक विहीर आहे. त्या विहिरीबद्दल अनेक किस्से त्यावेळी ऐकले होते. त्यामुळे वेळी अवेळी वा दुपारी आणि रात्री तिथून जाताना भीती वाटायची. वाडीच्या गणपतीचं विसर्जन मुखत्वे या दोन विहिरीत होत असे.
या पहिल्या मंदिराच्या विहिरी मागे सुद्धा एक एल आकाराची बैठी चाळ होती. ही सुद्धा संस्थेने बांधलेली होती. या चाळीसमोर म्हणजेच विहिरीच्या मागे उंच अशी आणि जाड जुड काही झाड होती. त्यामुळे या चाळीला आणि घरांना सावली आणि वारा भरपूर असायचा व उकाडासुद्धा कमी होता. यात दरेकर, वैद्य, सराफ, फडके, जोशी, कुलकर्णी असे अनेक ओळखीचे राहात होते. यातील कुलकर्णी सराफ आणि जोशी या काकूंची घनिष्ठ मैत्री होती. त्यामुळे बाहेर कुठेही जायचं असेल तर तिन्ही काकू एकत्रच जात असत. तरीही मुळात वाडीत वस्ती खूप मर्यादित असल्यामुळे आणि एकमेकांना एकमेकांची गरज असल्यामुळे , माणसांची जाण असल्यामुळे, एकमेकांकडे जाणं येणं होत, माणस बहुतांशी चांगली आणि पापभिरू होती.
छक्के पंजे जाणणारी वा करणारी माणस नव्हती अस नाही, पण प्रमाण अत्यल्प होत. त्यामुळे एखादा किस्सा असा ऐकायला मिळाला तरी महद् आश्चर्य वाटायचं. काळाने आता माणसाला प्रोफेशनल बनवलं. महिमा काळाचा आहे.
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
०४/०८/२०१८
Comments
Post a Comment