गोग्रासवाडी (डोंबिवली) ८
पावसाळ्यातली गोग्रासवाडी
सर्व परिसर पूर्ण मोकळा छान , काही मोजकी घर मध्ये मध्ये. गोग्रासवाडीतली वस्ती आणि मग आमच्या चाळी. बाकी पूर्ण भाग हा गवत, झाडी, शेती, मोठी मोठी झाडं, उंच सखल प्रदेश असा चित्रमय होता. नक्कीच एखाद्या फिल्मी लोकेशनला लाजवेल अस सर्व जग होतं गोग्रासवाडीच. कितीही चिंता असो, इथे माणूस आला की पार सर्व विसरून जायचा. हवा पण छान होतं, शुद्ध, सकस आणि गार नसली तरी आल्हाददायक नक्कीच होती.
आणि फक्त कल्पना करा की अश्या परिसरात , तोसुद्धा ७०, ८० च्या दशकातला पाऊस, कसा असेल. धो धो हा एकच शब्द चपखल आहे. त्यावेळी एकदा सुरू झालेला पाऊस, तासनतास आणि दिवसचे दिवस नुसता कोसळायचा. सलग चार चार दिवस पाऊस पडलेला पाहिलाय आम्ही. सर्व रस्ते मातीचे असल्यामुळे सर्वत्र नुसता चिखल आणि पाणी. त्यामुळे पावसाळ्यात गोग्रासवाडीला चिखलवाडी म्हणायचे. पण एक होत इतका पाऊस पडून सुद्धा कधीही पाणी साठलं नाही. याच कारण म्हणजे डामरीकरण झालं नव्हतं. त्यामुळे मातीत पाणी झिरपून जायचं, साठायचा प्रश्नच येत नव्हता.
गोग्रासवाडी मैदान त्याआधी देऊळ आणि मध्ये मोकळा परिसर थोडा उंच, थोडा सखल. पण पूर्ण मोकळा आणि गवत, शेती, झाड यांनी आच्छादलेला भाग. ते चालून आला की, थोडा उंच भाग, चढ म्हणूया. चढावर आलं की जगप्रसिद्ध चिंचेचं झाड होत. त्यावर आम्ही कित्येक तास बसलेले असायचो. या झाडामुळे आमच्या चाळीला नाव पण तसच होतं, चिंचेच्या झाडासमोरची चाळ आणि या पत्त्यावर पत्र येत असत त्यावेळी. नन्तर मध्ये एक छोटा रस्ता होता. मग भल मोठं अंगण आणि त्या अंगणाला लागूनच ७ बिऱ्हाड असलेली आमची बैठी आणि कौलारू राजाराम पाटील चाळ. घराला मोठा व्हरांडा पण होता. अंगण व्हरांडा अस खेळासाठी आपसूक तयार होतं. गोग्रासवाडीची वस्ती सुद्धा नन्तरची. फक्त आगरी वस्ती ती पण विखुरलेली होती. त्यामुळे त्या परिसरात १९६२ ला तयार झालेली पहिली चाळ म्हणजे आमची राजाराम पाटील चाळ.
पाथर्ली रोडवर आज असलेल्या सर्व वस्ती मध्ये सर्वात प्रथम बांधली गेली ती आमचीच चाळ. बाकी सर्व चाळी वा घरं ही नन्तर बांधली गेली. त्यात सुद्धा चाळीतल पहिलं बिऱ्हाड हे आमचं आठवल्याचं. नोव्हेंबर १९६२ ला आई बाबांचं लग्न झालं. त्यावेळी बाबा मोठ्या भावाबरोबर टिळकनगर मध्ये गंगानिवास मध्ये राहात होते. पण लग्न झालं आणि गरज म्हणून या चाळीत त्यांनी घर घेतलं, साधारण १९६३ च्या पहिल्या दोन तीन महिन्यात. त्यावेळी त्यांनी घर बुक केलं तेंव्हा फक्त पाया घातला जात होता रु.१,०००/- मात्र डिपॉझिट आणि भाडं रु. १८/- .
आईने सांगितलेल्या माहितीनुसार सुरवातीची २,३ वर्ष वीज नव्हती आणि विशेष वस्ती नव्हती. दिवसभर उजेड असायचा. पण रात्री काळोख आणि फक्त काळोख. वस्ती नसल्यामुळे सर्व भयाण होत. रात्री कोल्हे यायचे सुरवातीला वर्ष दोन वर्षे. पाणी सुद्धा १९७१ मध्ये आलं. विरळ असलेली वस्ती हळू हळू दाट होत गेली. गोग्रासवाडीच्या चाळी झाल्या, आमच्या चाळी मागे आमच्याच मालकांच्या १,२ इमारती, मालतीबाई बेंद्रे यांच्या २,३ चाळी, त्याला लागूनच नागु पाटलांची एक छोटी इमारत, सहस्त्रबुद्धे यांचा बंगला असा चौसोपी घेर आणि मध्ये आमचं वाडीतल्या (म्हणजेच या चार पाच चाळीतल्या मुलांचं ग्राउंड) जिथे २,३ टीम खेळत असत.
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
०७/०८/२०१८
Comments
Post a Comment