कवडसा
आज बरोबर चार वर्ष झाली , ती समरच्या अपघाताची छातीचा ठोका चुकवणारी आणि काळीज सुन्न करणारी बातमी आली, जणू संपूर्ण विश्व सभोवताली अचानक फिरतंय अस झाल आणि भूकंपाचा धक्का बसावा, तसा जाणवलेला आघात आठवला तरी थरकाप होतो. समर विश्वास , शीतल समर आणि शर्वरी एक छान त्रिकोण फक्त एका दुर्घटनेने कायमचा विखरून गेला. आणि त्याआधी नुकताच केलेला केरळ प्रवास आठवला. ते केरळ मधील मजेत घालवलेले ते दिवस आणि त्या ………… अजूनही सर्व आताच घडलय अस वाटतंय. ते समरच्या छाती वर डोकं ठेवून शांतपणे घालवलेले सर्व दिवस, त्याचा हात हातात घेवून ते तासनतास फिरणं , किती मजेच आयुष्य होत तोपर्यंत.
का हे दुःख या जगात फक्त माझ्याच वाट्याला आल, का हे एकटेपण मलाच मिळाल एखादा हक्क मिळावा तस. वाटत कधीतरी कुणीतरी या प्रश्नाची उत्तर आपल्याला देइल. आणि आता फक्त आठवणीत जगणं व जगलेल्या आठवणी एवढच शिल्लक उरलय. हि चार वर्ष आणि त्या वर्षातील प्रत्येक दिवस जणू एका जन्मासारखा भासतोय आणि आपणच हे जगलोय हा खरच भास वाटतोय. आणि एकट्या स्त्री कडे बघण्याची समाजाची दृष्टी, ती विखारी नजर अजूनही आठवल तरी काटा उभा राहातो. पण या सगळ्यात निर्मळ स्वभावाची आणि निष्पाप नजरेची माणस भेटल्यावर माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा होणारा साक्षात्कार सुखावून जातो
शर्वरीला सुद्धा समर प्रमाणेच मार्केटिंग विषयाची आवड आणि तिला I I M मध्ये मिळालेला प्रवेश आणि आपल्या लाडक्या वडिलांच स्वप्न पूर्ण करण्याची तिची जिद्द आणि धडपड मनाला भावून जाते. आता एकच आस आहे शर्वरीच शिक्षण आणि तिचा लग्न झालं कि समरच स्वप्न पूर्ण केल्याच समाधान. त्यात आशुतोष आणि मानसी यांची साथ, गेल्या चार वर्षात आपल्याला उभ राहायला मोलाची ठरली. त्याशिवाय या भयंकर जीवघेण्या प्रसंगातून सावरणं खूपच कठीण होत.
एक बर आहे कि नृत्याची असलेली आवड त्याला समरन दिलेली साथ यामुळे माझ पुन्हा उभ राहणं खूप सोप गेल. त्यामुळे शिकवण्याची इच्छा आणि थोडाफार चरितार्थाचा आधार आणि विरंगुळा हे तीनही साध्य झाल. योगेंद्र माझ्या कॉलेज मधील एक सहकारी या व्यतीरिक्त त्याला मी ओळखत नव्हते. पण नुकतीच त्याची झालेली ओळख, त्याची एका गूढ आणि गहन विषयातील आवड , तो विषय आणि त्यातील प्रत्येक संज्ञा यांचा एकेक पदर हळूवार उलगडून दाखवण्याची त्याची हातोटी खूपच विलक्षण आहे. त्याचा निर्मळ आणि निष्पाप स्वभाव आणि काहीसा वेडेपणा (हं हं…. त्याच्याच भाषेत ) खरच खूप विश्वासार्ह आहे.
चला शितलबाई मुली यायची वेळ झाली आता या भावविश्वातून थोड्या वेळा साठी बाहेर या. पण खरोखरच या भावविश्वाची सफर हि भावते पण आणि आता ती जणू जीवनाचा एक अविभाज्य भागच आहे. चला आवरायला हव उठा आता .
क्रमशः
कवडसा या प्रदिर्घ ब्लॉग कादम्बरीचा लेखक प्रसन्न आठवले ः जे हि कादम्बरी वाचतात त्याना हि विनंति कि त्यानी क्रूपया आपले मत नोंदवावे जेणे करून मला कळेल कि वाचक प्रतिसाद कसा आहे. हि एक प्रदिर्घ कादम्बरी आहे आणि ति रोज या स्वरूपात ब्लॉग वरच प्रसिद्ध होइल.
ReplyDelete