गीत विश्लेषण - भाग २ " तोरा मन दर्पण कहलाये"
प्राणी अपने प्रभु से पूछे किस विधी पाऊँ तोहे
प्रभु कहे तु मन को पा ले, पा जयेगा मोहे
तोरा मन दर्पण कहलाये - २
भले बुरे सारे कर्मों को, देखे और दिखाये
तोरा मन दर्पण कहलाये - २
मन ही देवता, मन ही ईश्वर, मन से बड़ा न कोय
मन उजियारा जब जब फैले, जग उजियारा होय
इस उजले दर्पण पे प्राणी, धूल न जमने पाये
तोरा मन दर्पण कहलाये - २
सुख की कलियाँ, दुख के कांटे, मन सबका आधार
मन से कोई बात छुपे ना, मन के नैन हज़ार
जग से चाहे भाग लो कोई, मन से भाग न पाये
तोरा मन दर्पण कहलाये - २
तन की दौलत ढलती छाया मन का धन अनमोल
तन के कारण मन के धन को मत माटि मेइन रौंद
मन की क़दर भुलानेवाला वीराँ जनम गवाये
तोरा मन दर्पण कहलाये - २
चित्रपट : काजल
संगीतकार : रवी
गीतकार : साहिर लुधियानवी
गायक : आशा भोसले
खरंतर मनावर इतक सगळं लिहिलं गेल्यावर अजून लिहिण्यासारखं काही असेल असं सकृतदर्शनी वाटत नसलं तरी मानवी मन हि गोष्ट अशीच आहे. खरंच एक विचार करा. परमेश्वराबद्दल आपण काय काय वाचलंय , ऐकलंय ते सर्व मनाला लागू पडतं . पडतं कि नाही बघा. निर्गुण, निराकार, पण मानवी रूपात वा देह रूपात साकार, अचाट आणि अफाट शक्तीचा स्रोत, जे इच्छिल ते ते देणारा, मनात आणलं तर हिमालयाचा नाश करू शकणारा, इच्छा आणि प्रयत्न यांची जोड दिली तर कठीणातील कठीण कार्य करू शकणारा , अनेक रूपात प्रकट होऊ शकणारा, कल्पना शक्तीच्या जोरावर प्रतिसृष्टी तयार करण्याची हिम्मत असणारा, शुद्ध स्वरूपात असेल तर प्रत्यक्ष ईश्वर, अशुद्ध आणि वासनामय रूपात असेल तर प्रत्यक्ष असुरच. आज जे असुराचं रूप पदोपदी पाहायला, वाचायला मिळतं ते याच मनाच्या विकृत अवस्थेचं रूप आहे.
मी पहिल्या भागात मांडलेलं सूत्र अत्युत्तम शब्दात गीतकार पहिल्या दोन ओळीतच मांडतो. मन म्हंणजे खऱ्या अर्थाने परमेश्वराचं अस्तित्व असेल तर त्याचं प्रतिबिंब अर्थात समजणाऱ्यासाठी फक्त. साधनेच्या परम विशिष्ट भावावस्थेत साधक , संत , ऋषी, महर्षी जो प्रश्न परमेश्वराला विचारतात तोच प्रश्न गाण्यात सर्वात आधी विचारलाय. प्राणी म्हणजे अर्थातच मनुष्य असा अर्थ घ्यायचा. पण मनुष्य म्हणजे कोणीही साधा मनुष्य नाही म्हणजे नसावा. तर ज्याला काही उपरती आली आहे वा ज्याला आपल्या चुका जाणवल्यात वा ज्याचं मन त्याला ईश्वरप्राप्तीची इच्छा व मार्ग याचा शोध घेण्याची सद्बुद्धी देतं , तो प्राणी असा घ्यायचा. कारण ज्याला जागृतता आली आहे, ज्याचं मन विषयाकडून निर्विषय होण्याकडे लागलं आहे वा ज्याला त्याची ओढ आहे तोच मनुष्य जागृत म्हणता येईल. बाकी सर्व फक्त प्राणी साधे. असा जागृत अवस्थेला पोचलेला प्राणी ईश्वराला विचारतो कि तुला कसं प्राप्त करून घेता येईल. इथे खरी मेख लक्षात घ्या.
जर त्याला प्राप्त करून घ्यायचं आहे तर त्यालाच कसं काय विचारणार आणि जर त्याला विचारू शकतो तर तो प्राप्तच आहे. मग अजून काय त्याला प्राप्त करणार. म्हणजेच तो स्वतःच्या मनाला विचारतो आणि मन हा शरीर व अंतरात्मा यांना विचाराच्या शक्तीने जोडलं गेलेलं संयंत्र वा दुवा वा माध्यम असल्यामुळे प्रत्यक्ष आपल्या अंतरात्म्यालाच विचारतोय कि मला ईश्वर प्राप्तीचा मार्ग काय तो सांग.
पण तसं न विचारता तुला प्राप्त कसं करू हे विचारतो. अर्थातच आपल्या आतील ईश्वराला विचारणं आहे हे कि तुज पर्यंत कसं पोहोचू. अर्थातच मनाच्या गाभाऱ्यात साक्षात अस्तित्वात असलेल्या, पण जगाच्या व्यापात बुडालेल्या मानवाला आतल्या ईश्वराच्या प्राप्तीचा मार्ग प्रत्यक्ष मनातून जातो असं सूचक उत्तर मिळतं . ते अनेक अर्थाने खरपण आहे. मनाला प्राप्त कर हे खूप वेगळ्या अर्थी घेतलं तर मनाला ताब्यात ठेव असा ऐहिक अर्थ निघतो. अर्थातच तो चुकीचा आहे. कारण मुळात मन जितकं ताब्यात ठेवायला आपण जाऊ तितकं ते उसळी मारून अजून निसटून जातं पाऱ्यासारखं. मग नक्की काय उपाय आहे ज्यायोगे मन आणि त्यामार्फत आतील ईश्वराला प्राप्त करून घेता येईल. मला वाटतं, त्यासाठी आधी मनाला समजून घेणं महत्वाचं आहे. कारण एखादाला पूर्ण जाणलं, तरच त्याच्याशी मैत्री करता येऊ शकते. म्हणूनच सरळ मनाकडे वळताना गीतकार पहिल्याच ओळीत, अर्थातच सर्वांना उद्देशून , लिहितात.
मुळात मन हे काय आहे तर एक दर्पण म्हणजेच आरसा आहे. मला वाटतं, ईश्वराच्या निर्गुण निराकार स्वरूपाचं आरश्या इतकं उत्तम उदाहरण नाही. दुसरं असं कि, आरसा हा जे दिसतं, ते दाखवणारा सर्वसाक्षी, पण त्रयस्थ आहे. त्याअर्थी ईश्वर पण तसाच आहे. तो तुमच्या कर्माच्या फलामध्ये कुठेही येत नाही वा गुंतत देखील नाही. तो साक्षी आहे , पण निरपेक्ष आहे. कारण जे तुम्ही कराल त्याचंच फलरूप तुम्हाला परत करणं हे त्यानेच जगराहाटीसाठी केलेल्या संकल्पाचं पालन करणं, त्याचं, अर्थात ईश्वराचं कर्तव्य पण आहे. अजून एका अर्थी दर्पण हि संकल्पना योग्य वाटते कि दर्पण नेहमी उलटी बाजू जी तुम्हाला दिसू शकत नाही ती दाखवतो. म्हणजे नाण्याची दुसरी बाजू साधारण. दर्पण म्हणजे आरसा हे कधीही काहीही स्वतःकडे ठेवत नाही. समोर आलं ते परत तुमच्यापर्यंत पोचवणं वा तुम्हाला दर्शवणं हे त्याचं काम तो करतो, ती वाईट कि चांगलं तुम्ही ठरवायचं. म्हणजे तुमच्या मार्फत जे त्याच्यापर्यंत गेलं ते आरश्याच्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोचतं केलं कि त्याच कार्य संपलं .
भाग २ समाप्त.
क्रमशः
©® संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले.
१४/०९/२०१९
Comments
Post a Comment