गीत विश्लेषण - भाग १ " तोरा मन दर्पण कहलाये"
प्राणी अपने प्रभु से पूछे किस विधी पाऊँ तोहे
प्रभु कहे तु मन को पा ले, पा जयेगा मोहे
तोरा मन दर्पण कहलाये - २
भले बुरे सारे कर्मों को, देखे और दिखाये
तोरा मन दर्पण कहलाये - २
मन ही देवता, मन ही ईश्वर, मन से बड़ा न कोय
मन उजियारा जब जब फैले, जग उजियारा होय
इस उजले दर्पण पे प्राणी, धूल न जमने पाये
तोरा मन दर्पण कहलाये - २
सुख की कलियाँ, दुख के कांटे, मन सबका आधार
मन से कोई बात छुपे ना, मन के नैन हज़ार
जग से चाहे भाग लो कोई, मन से भाग न पाये
तोरा मन दर्पण कहलाये - २
तन की दौलत ढलती छाया मन का धन अनमोल
तन के कारण मन के धन को मत माटि मेइन रौंद
मन की क़दर भुलानेवाला वीराँ जनम गवाये
तोरा मन दर्पण कहलाये - २
चित्रपट : काजल
संगीतकार : रवी
गीतकार : साहिर लुधियानवी
गायक : आशा भोसले
एका सुंदर चित्रपटातील सुरवातीचंच हे गीत आहे. म्हणजे शीर्षकं येतात, तिथेच हे गाणं शीर्षकांसोबत येतं . मीनाकुमारी आणि दुर्गा खोटे या दोन सशक्त अभिनेत्रींवर चित्रित झालेलं, पण मीनाकुमारी यांनी पडद्यावर अभिनित केलेलं आहे. एका सुंदर बंगल्यातील तितक्याच मोठ्या दिवाणखान्यात असलेल्या देवघरात हे गाणं आपल्याला घेऊन जातं . अर्थातच त्या आधी गाणं सुरु होताना जी दृश्य बंगल्याबाहेरील चित्रित केली आहेत, ती गाण्याचं महत्व आणि माहिती अधोरिखित करतात. मनाच्या भावविश्वाच्या वेगवेगळ्या अवस्था आणि रंगछटा दाखवताना एक गरा गरा गोल फिरणारा पक्षी , उडणारे कारंजे, उडणारे पक्षी, नाचणारा मयूर, या सर्व अस्थिर चर सृष्टीच्या माध्यमात बंगल्याच्या देवघरात आपण जातो. इथे मीनाकुमारी हे गीत म्हणत आहेत. तिथे अर्थातच कॅमेरा आणि आपण शांत होतो. कदाचित गीतकाराला काय सांगायचंय आणि संगीतकाराने ते तितक्याच ताकदीने मांडलंय ते कॅमेराच्या सशक्त माध्यमातून दिग्दर्शक आपल्यासमोर उत्तम रीतीने मांडतो.
इथे खूप महत्वाची गोष्ट त्या देवघरात दाखवलं, ते म्हणजे देवघरात कृष्णाची अनेक शिल्पं आहेत. कृष्णाच्या जीवनातील वेगवेगळ्या प्रसंगांची ही शिल्प अतिशय मनमोहक आहेत. अर्थातच मनाचा विषय निघाला की श्रीकृष्ण हा आलाच. कारण त्यांनी स्पष्ट शब्दात गीतेत सांगितलं आहे की, इंद्रियांमध्ये मी मन आहे. सर्वात शेवटी कॅमेरा देव्हाऱ्यात मुरलीधर श्रीकृष्णाच्या सुंदर मूर्तीवर स्थिरावतो. मनाचा राजा असलेल्या भगवान श्रीकृष्णाला पाहण्याचा एक वेगळाच आनंद या सीनला दिग्दर्शक देऊन जातो.
साहिर लुधियानवी या एका सशक्त आणि ताकदीच्या गीतकाराने अर्थात कवीने हे गीत चित्रपटासाठी लिहिलंय. गीतकार असूनही मूळ शायरी पिंड असलेला त्यांच्यातील शायर कमी शब्दात उत्तम परिणाम साधू शकतो. अर्थातच इतक्या श्रेष्ठ कवीने लिहिलेलं गीत तितकंच सुंदर असणार यात शंका नाही. मुळातच मानवी मन हे एक अलौकिक रसायन परमेश्वराने तयार करून जन्मतः मानवाला देणगी स्वरूपात बहाल केलं. जे इतर कोणत्याही प्राण्यांहून मानवाला वेगळं असल्याचं सिद्ध करतं . बाकी सर्व प्राणी चार कर्तव्यात व्यग्र असतानां, माणसाला मात्र मन, विचार आणि बुद्धी हि त्रिगुणात्मक शक्ती वरदान देऊन खरंतर विध्यात्याने अनंत उपकार केलेत. अन्यथा इतर प्राणी आणि मानव यात फरक, शारीरिक , सोडला तर काहीच नाही. या त्रिगुणात्मक त्रय मूर्तीलाच ईश्वर संबोधलं तर वावगं ठरू नये, असं माझं मत. हीच त्रयी सूत्रबद्ध पद्धतीने काम करत असेल तर मनुष्य सूर अन्यथा असुर, हि आपली माझी धारणा.
खरतर मनावर असंख्य लोकांनी जसे संत, महंत, ऋषी, महर्षी, कवी, लेखक, या सर्वांनी कित्येक लक्ष वेळा लिहून ठेवलंय . तरीही माणूस आपल्या मनाच्या आतील आवाजाला न ओळखता षडरिपूंच्या आहारी जाऊन वासनेच्या , मायेच्या मोहापायी जन्मजन्मांतरीच्या फेऱ्यात अडकतो. बाहेर पडायचा मार्ग आहे, पण इच्छा नसल्यामुळे पुन्हा त्याच चक्रात पिचत राहतो. मला तर बरेच वेळेला परमेश्वर म्हणजे खूप मोठा संगणक तज्ज्ञ वाटतो. संगणक म्हणजे मानवी शरीर, संगणक आज्ञावली (प्रोग्राम) म्हणजे आपलं जीवन, त्या आज्ञावलीची चावी आपल्याच हाती मन, बुद्धी आणि विचार या त्रिसूत्रीच्या माध्यमातून मानवाच्या म्हणजेच संगणकाच्याच हातात दिल्ये. पण संगणकालाच माहीत नाही वा माहित असून त्या त्रिसूत्रीचा आणि त्याद्वारे मिळालेल्या चावीचा वापर करण्याची इच्छा , (ही चवथी चावी , कळ वा शक्ती, या तीन सुत्रांना नियंत्रणात ठेवू शकणारी आपल्या हातात आहे) हेच माहीत नाही. बघा विचार करून जीवनाचं सर्व गणित उलगडत जाईल.
अगदी तीच मुख्य कळ अर्थात मन याबद्दल गीतकार साहिर यांनी सर्वोत्कृष्ट शब्दात आणि योग्य भाषेत सार मांडलंय असं मला हे गीत ऐकताना वाटतं. अर्थात भगवद्गीतेत प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण, संतश्रेष्ठ ज्ञानोबा व तुकोबा माउली आणि इतर अनेक संतांनी हीच सूत्री आपापल्या शब्दात सुयोग्य रित्या जगापुढे मांडून ठेवली आहे. या सर्वात अग्रणी ठरले ते अर्थातच श्री समर्थ रामदास स्वामी. ज्यांनी मनाला चुचकारून, आंजारून, गोंजारून, वेळ प्रसंगी नियम लावून ताब्यात ठेवण्याची आज्ञावलीच मानवाला दिली आहे, मनाचे श्लोक या रुपात. अर्थातच आपण फक्त ते पाठ करण्यासाठी उपयोगात आणतो तो भाग वेगळा. पण समर्थानी सांगितलेले मनाचे श्लोक नीट वाचले तर साहिर यांनी या गीतात जे मांडलंय ते या पेक्षा वेगळं नाहीये.
भाग १ समाप्त.
क्रमशः
संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले.
१३/०९/२०१९
Comments
Post a Comment