Skip to main content

कालाय तस्मै नमः १

कालाय तस्मै नमः १ 

©® संकल्पना, मांडणी आणि विचार: प्रसन्न आठवले.

सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने ही एक नवीन लेखमाला लिहायची प्रेरणा प्राप्त होत आहे. यामध्ये विषयाच्या ओघात काय काय येईल, हे फक्त माझे सद्गुरू जाणतात. त्यामुळे जे प्राप्त होईल ते मांडणं, इतकंच माझं काम आहे. ते काम निमूटपणे, प्रामाणिकपणे आणि भक्तिपूर्ण अंतःकरणाने करणं हा माझा धर्म असेल. म्हणून प्रेरणा सद्गुरूंची आणि लेखणी माझी. असो. आज आपण विषयाची ओळख करून घेऊया. 

काळाचा महिमा अपरंपार आहे. तो वेद, उपनिषद्, श्रुती, स्मृती, पुराणं, धर्मग्रंथं, संत महंत, लेखक, कवी यांनी अनेक प्रकारे आणि अनेक पद्धतीने मांडला आहे. हा एक असा विषय आहे, जो देह समाप्ती नंतरच अनुभवता येतो आणि एकदा अनुभव घेतला तरी मागे येऊन जगाला सांगता येत नाही. संत महंत, ज्ञानीजन यांनी जे लिहिलं आहे किंवा जे काही आपल्याला अनेक ठिकाणांहून माहीत झालेलं आहे, ते प्रत्यक्षाच्या अत्यल्प प्रमाणात आहे आणि ते त्यांच्या अंतःप्रेरणेचा भाग आहे. 

त्याला जाणण्याचा प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळणं हे महद् भाग्य आहे. याआधी ज्यांना ज्यांना अशी प्रेरणा झाली असेल, त्यांना सद्गुरू आणि ईश्वर कृपेने तशी प्रेरणा मिळाली असणार हे नक्की. मला स्वतःला गेले अनेक दिवस, चिंतनात या विषयाची प्रेरणा मिळत होती. पण दिशा, विषय आणि सूत्र मिळत नव्हतं. अर्थात एखाद्या गोष्टीची वेळ (काळाचं एक छोटं परिमाण) आणि सद्गुरूंची अनुमती याव्यतिरिक्त हे अशक्य आहे. 

खरतर काळ हा एक वर्तुळाकार अर्थात गोलाकार (लंबगोलाकार किंवा एकत्रिज्या गोलाकार) असावा. कारण प्रत्येक युग, त्यातील शतकं, त्या शतकातील वर्षं, त्यातील प्रत्येक मास, दिवस, घटिका, पळे अर्थात तास आणि सेकंद किंवा क्षण अन् क्षण हा पुनरावृत्त आहे. अर्थात पुन्हा पुन्हा येणारा आहे. अशी स्थिती फक्त गोलाकार वास्तूंच्या बाबत शक्य आहे. 

दुसरं म्हणजे गोलाकार वस्तूंच्या भ्रमणाला निश्चित सूत्रबद्धता, निश्चित कार्यकाळ व निश्चित समीकरण असू शकतं. कारण काळाच्या पुनरावृत्तीला निश्चित परिमाण, सूत्र व गणित आहे, हे अध्यात्म आणि आधुनिक विज्ञान दोघेही जाणतात. म्हणूनच आपण दिनदर्शिका तयार करू शकतो, पंचांग,कुंडली, ज्योतिष मांडू शकतो. 

यामागे असलेलं तिसरं तर्क म्हणजे विश्व निर्मात्याने एकसूत्रता, गणित व विज्ञान यासाठी, या ब्रम्हांडातील सर्व काही गोलाकार रचनेत तयार केलेलं आहे. सर्व ग्रह तारे हे त्याचं वास्तव रूपातील प्रगटीकरण आहे. अर्थात या कल्पना अंतःप्रेरणेने हजारो लाखो वर्षांपूर्वी ऋषी मुनी यांनी भौतिक, खगोलीय आणि वैज्ञानिक सूत्रांतून मंत्र, श्लोक व स्तोत्र या माध्यमातून मांडलेल्या आहेत. एक उदाहरण देतो, म्हणजे लक्षात येईल. 

अगदी आता आता तीनशे वर्षांपूर्वी लिहिलेल्या मारुती स्तोत्रात, प्रत्यक्ष समर्थ रामदास स्वामी यांनी, एका ओळीत त्याचा उल्लेख केला आहे. 
" ब्रह्मांडे माईली नेणो.......". यामध्ये त्यांनी ब्रह्मांडे असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. म्हणजेच अनेक ब्रह्मांडे अस्तित्वात आहेत, हे त्यांनी अनेक वर्षांपूर्वी लिहून ठेवलं आहे आणि ती ब्रह्मांडे हनुमंताच्या एका नेत्रात सामावली अर्थात मावली आहेत. यावरुन हनुमंताचा आकार किती व कसा असेल, याची आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही. पण ज्यांनी प्रत्यक्ष श्रीराम आणि हनुमंत यांचं दर्शन घेतलं, त्यांना हे ज्ञान नक्कीच अंतःप्रेरणेने ज्ञात झालेलं असणार हे नक्कीच. 

अनेक ब्रह्मांडे असल्याचा अजून एक उल्लेख महाभारतात येतो. भगवान श्री कृष्णांना भेटायला, ज्यावेळी स्वतः ब्रह्मदेव येतात, तेंव्हा श्रीकृष्ण त्यांना उलट प्रश्न निरोप म्हणून पाठवतात की त्यांना विचारा कोणते ब्रम्हदेव आले आहेत. त्याच प्रसंगात ब्रम्हदेव खजील होऊन, क्षमा मागून विचारतात, तेंव्हा श्रीकृष्ण त्यांना उत्तर देतात की, अगणित ब्रह्मांडे आहेत आणि त्या प्रत्येक ब्रम्हांडात एक एक ब्रम्हदेव स्थापित आहेत. त्यातील आपण कोणत्या ब्रह्मांडाचे ब्रम्हदेव आहात. यातून अनेक तर्क निघतात. विषयाच्या ओघात आपण त्यावर चिंतन करूया. 

यातून अजून एक प्रश्न निर्माण होतो की, जर असं आहे तर आपल्याला अनेक श्रीविष्णू मूर्तीत नाभिकमलात एकच ब्रम्हदेव कसे दिसतात. यातून एक तर्क असा निघतो की कदाचित आपल्या या ब्रह्मांडाचं प्रतीक म्हणून आपल्याला एकच नाभीकमल आणि त्यातील एकच ब्रम्हदेव दर्शवण्याची प्रेरणा होत असावी. यावर पुढे विषयाच्या ओघात येईल, त्यावेळी त्यावर लिहिण्याचा प्रयत्न करेन. 

असो. तर अशा या वर्तुळाकार काळाच्या स्वरूपाला कल्पनेत आणण्यासाठी अजून एक उदाहरण देतो. श्री विठ्ठलाच्या आरतीत, युगे अठ्ठावीस असा उल्लेख आहे. म्हणजेच चार युगांचे सहा पूर्ण कल्प होऊन, सातव्या कल्पातील तीन युग पूर्ण झाली आहेत आणि चवथ्या युगातील पाच हजारांहून अधिक वर्ष झाली आहेत. इतकी वर्ष श्री विठ्ठल रखुमाई, पंढरीत उभे आहेत. 

असो. आज इथेच थांबूया. या मालिकेतील लेख प्रतिदिन असतील की नाही, हे आज मी सांगू शकणार नाही, पण प्रयत्न जरूर करेन. 

ॐ शिवशक्ती रुपाय नमः ll
ॐ शिवाय नमः ll
श्रीराम जयराम जय जयराम ll

©® संकल्पना, मांडणी आणि विचार: प्रसन्न आठवले.
9049353809
9960762179
२२/०३/२०२५

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...