#आत्मचिंतन_बोध भाग १०
©® संकल्पना आणि लेखन: प्रसन्न आठवले
एका देहात स्थित झालेला हा आत्मा, सहसा, देह सोडून जाण्यास तयार नसतो. किंबहुना कोणताही जीव, अश्या तयारीत सहसा नसतो. त्याला त्या देहातून बाहेर काढणं, ही देखील एक मोठी जिकिरीची प्रक्रिया आहे. याचसाठी मृत्यू या व्यवस्थेची निर्मिती ईश्वराने केलेली आहे. एका भुलोकी, (कदाचित या ब्रम्हांडात अनेक भुलोक आणि इतर सप्त लोक असू शकतील), करोडो देहातील एका देहात असलेला आत्मा, काढून न्यायचा.
त्याचा हिशोब करायचा आणि त्याला पुन्हा दुसऱ्या देहात, जन्मात, जाण्यासाठी, नेऊन त्या त्या लोकात स्थापित करायचा.ही सर्व व्यवस्था, शतका नुशतके, युगानुयुगे सुरळीत, नियमबद्ध रीतीने सुरू आहे. हाच एक अद्भुत चमत्कार आहे. अगदी संगणकीय भाषेत सांगायचं तर, कृत्रिम बुध्दिमत्ता असलेल्या व्यवस्थे प्रमाणे, सुरू आहे. या सर्व विवेचना वरून, लक्षात आलं असेल की, आपण इथे बसून फक्त या देहात असलेल्या भोग व उपभोग या चक्राचा, स्वतःच्या भाग्य दुर्भाग्य, दुर्दैव याचा विचार करण्यात मग्न असतो.
पण हे करताना, आपण, आपल्याच या आणि पुढील जन्मांची व्यवस्था सुरळीत करतो, की, त्याला अजून समस्येत ढकलतो, हे आज समजत सुध्दा नाही. पण ते घडून, कोणत्यातरी जन्मात, त्याचं फल समोर येतं, त्यावेळी, शारीरिक, बौद्धिक व मानसिक त्रास किंवा आनंद, इतकचं आपण करतो. कारण कर्माची देणी तयार करताना किंवा येणी निर्माण करताना, आपण हा विचार केलेला नसतो की, याचे परिणाम कदाचित या किंवा पुढल्या जन्मात केंव्हातरी, येणार आहेत.
अर्थात हे सर्व चिंतन करून मला आज काय फायदा आहे. विचार येणं स्वाभाविक आहे. कारण कळलं तरी वळून, त्यात सुधारणा कशी करणार, मुळात करता येणार का, केली तरी आज जे भोगणे आहे, त्याच्याबद्दल काय. हे आणि असे असंख्य प्रश्न,आपल्या मनात फिरायला लागतात.
एक लक्षात घ्या की, कर्मसाखळी ही तोडून किंवा चित्त शुद्धीने आणि आत्मज्ञान प्राप्त करून म्हणजेच मुमुक्षू होऊन अथवा भक्तीसाधना करत उच्च पातळी गाठून, माणूस एखाद्या जन्मात, मोक्ष प्राप्तीच्या दिशेने, पुढे जाऊन अंती पुढील एखाद्या जन्मात, ईश्वर प्राप्ती करून घेऊ शकतो. हे सहज साधता येणारं नसेल तरीही, परिश्रमाने त्या मार्गावर वाटचाल सुरू करू शकतो.
पण हे सर्व किंवा यातील काहीतरी का करायचं आहे, याबद्दल जाण होणं किंवा जिज्ञासा जागृत होणं, हे तोपर्यंत अशक्य आहे, जोपर्यंत त्याची गरज वाटत नाही किंवा अपरिहार्यता निर्माण होत नाही. मानवी स्वभाव हा अनेक अंगांनी, संस्कार इत्यादी अनेक गोष्टींनी तयार होतो. पण सर्वसामान्य मानवी स्वभाव हा, तहान लागत नाही, तोपर्यंत पाण्याची व्यवस्था न बघणारा आहे. त्यामुळे, भौतिक जीवनात ही स्थिती, तर अध्यात्मिक, आत्मिक जीवनाबद्दल, न बोललेलच बरं आहे.
कारण भौतिक जगतात परिणाम, प्रत्यक्ष दिसून सुद्धा, माणूस अनेकवेळा, त्याबद्दल आगाऊ तरतूद करायला आळस, टाळाटाळ करतो. बघू करू, हा सर्वसाधारण मानवी स्वभाव आहे. जीवनातील एक नित्य अपरिहार्यता म्हणजे बदल,ते स्वीकारणं,कठीण जातं. वयाचा, परिस्थितीचा नात्यातील स्वभाव बदलाचा, स्वतःतील मानसिक बदलाचा, काळाचा इत्यादी अनेक बदल, स्वीकारणं,कित्येकांना कठीण जातं. त्यामुळे, अध्यात्मिक बाबतीत, कित्येक जण विचार सुद्धा करण्याच्या प्रश्न नसतो.
हाच विषय आणि मुद्दा पुढे, उद्याच्या चिंतनात चर्चेला घेऊया.
©® संकल्पना आणि लेखन: प्रसन्न आठवले
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
०३/११/२०२३
Comments
Post a Comment