#आत्मचिंतन_बोध भाग ८
भुलोकि जे नियम आहेत आणि जे काल पाहिले, ते खालीलप्रमाणे :
१. कर्मसिद्धांत.
२. इथलं कर्म इथेच फलित.
३. फलरहित कर्म नाही.
चवथा नियम म्हणजे, जितके श्वास आहेत तितकं जगण्याचं बंधन आहे. म्हणजे जितक्या श्वासात आयुष्य लिहिलेलं आहे, ते आपल्याला जगूनच संपवणे क्रमप्राप्त आहे. याचे दोन अर्थ होतात, दोन्ही पाहूया. एक म्हणजे आपलं आयुष्य हे श्र्वासांचं आहे. याचं कारण म्हणजे, कालगणना हा मानवाने, या भूलोकात विकसित केलेला, या भुलोका साठीचा,गणिती प्रकार आहे. तो वेदकाळा पासून सुरू झाला असावा. पण हे ब्रम्हांड तयार केलं, त्यावेळी कालगणना ही श्र्वासांच्या लहरी किंवा कंपन यावर गणलं गेलं आहे. देहासाठीची ही मापन पद्धती, फक्त या मृत्युलोकासाठी आहे, हे देखील पाचवा नियम म्हणून लिहून घ्या.
ती मूळ सुरुवात किंवा मापन पद्धती आहे,जी विधात्याची उपलब्धी आहे. त्याच्या लेखी व त्यांच्या हिशोबात, आपलं आयुष्य, याच मापन पद्धतीने मोजलं जातं.म्हणजेच आपण मृत्यू पश्चात त्याच्या विशिष्ट व्यवस्थेपुढे जाऊ किंवा जातो, तेंव्हा तिथे आपला हिशोब श्वासांच्या आधारे किती झाला, याचा ताळेबंद काढला जातो. यातून जो दुसरा अर्थ निघतो किंवा derived meaning आहे, ते म्हणजे, जर हे श्वास आपण नियमात बांधू शकलो, तर आपलं देहातील वास्तव्य आणि आयुष्य दोन्ही वाढू शकतं का.
तर याचं उत्तर नक्कीच हो, असं देता येईल. कसं ते पाहू. जर आयुष्याचं ईश्वरी गणित श्र्वासांचं असेल तर देहाचं वय आणि देहातील आत्म्याच्या अस्तित्वाचा काळ, याला ईश्वराच्या लेखी काहीही महत्व नाही. आता याचा प्रत्यय किंवा प्रचिती पाहण्याचा प्रयत्न करू. अनेकदा आपण एखादा मनुष्य किंवा व्यक्ती खूपच लवकर किंवा तरुण वयात गेली असं म्हणतो. त्याचं कारण आपण त्याचं आयुष्य देहात आणि देहामुळे असलेलं आणि दिसलेलं पाहतो आणि मोजतो.
पण विधाता याची किंवा यासाठी वेगळी परिमाणं वापरतो. त्यामुळे, त्या आत्म्याला प्रदान केलेले, तितके श्वास, त्या आत्म्याने घेऊन झाले की, त्या देहातील त्या आत्म्याचा वास्तव्य कालावधी संपतो. अर्थातच, त्या आत्म्याला तिथून निघण्याची आज्ञा होते. ही आज्ञा म्हणजे काय आणि त्याच्या बाबत पुढे चर्चा करूच. आता यातून झालेला अजून एक बोध म्हणजे, जर का या श्वासांना, रोधून किंवा रोखून धरता आलं, तर या देहाचा आणि देहातील आत्म्याच्या वास्तव्याचा काळ वाढू शकतो.
याच तत्वाला किंवा नियमाला आधार मानून, यम, नियम, योग, याग, प्राणायाम, ध्यान, धारणा इत्यादी शास्त्र, व्यवस्था, चिकित्सा पद्धती, ऋषीमुनी या शास्त्रज्ञांनी शोधून काढली. त्याच्या आधारावर, असं म्हटलं जातं की, आजही या भारतात आणि विशेषतः हिमालयात, अनेक योगी, तपस्वी, साधक, ऋषी मुनी गेली कित्येक हजार वर्षे, ध्यान लावून, श्वास रोधुन वा रोखून, आपला देह टिकवून आहेत.
म्हणजेच त्यांच्या लेखी, त्यांनी, श्वासात मोजलं गेलेलं विधात्यच्या आयुष्याचा सदुपयोग करून, आपला देह जीवित ठेवलेला आहे. याच आधारावर माऊली महा वैष्णव, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी, संजीवन समाधी घेतली. अर्थात त्यांची अवस्था किंवा स्थिती ही, अजून पुढची आहे. ज्याला शास्त्रीय परिभाषेत, demateriali sation म्हणता येईल. याचा विचार पुढे एखाद्या भागात करूया.
©® संकल्पना आणि लेखन: प्रसन्न आठवले
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
०१/११/२०२३
Comments
Post a Comment