Continuing आनंद
कालच्या आनंद चित्रपटावरील पोस्टला घरून
यात मन्नाडेंच एक गाण आहे. जेंव्हा आनंद, दोन्ही प्रियकर प्रेयसी म्हणजेच बाबुमोशाय आणि रुणु याना चौपटीवर घेऊन येतो. व्यक्त होण्यासाठी , मनातल एक एकमेकांच प्रेम सांगून मोकळ होण्यासाठी. आणि नन्तर दोघेही काही बोलत नाहीत हे पाहून बाबुमोशायला डरपोक आणि हैपोक्रेट म्हणून निघुन जातो. I hate you म्हणत.
या पार्श्वभूमीवर मन्नाडेंच एक छान गाण सुरु होत. ' जिंदगी कैसी है पहेली ' सलिलदांच सुमधुर संगीत ट्रम्पेटने होणारी सुरवात आणि गुलज़ारजींचे शब्द.
मरणाच्या दारात उभा असलेल्या आनंदला वास्तविक जीवनातला आणि जीवनाबद्दल पडलेला प्रश्न.
जिंदगी कैसे है पहेली हाये
कभी ये हसाये कभी ये रुलाये
गेले क्षण परतून न येती
उगा वाकुल्या दावून जाती
क्षणात हसवून जाती
फसवून क्षणात निघुनी जाती
कधी हसवणार तर क्षणात काही हिरावून घेऊन फसवून निघुन जाणार.
खरच आहे ते.
त्याच धाग्याला जोडून गुलज़ार पहिल्या कडव्यात लिहितात
कभी देखो मन नाही जागे
पीछे पीछे सपनोके धागे
एक दिन सपनोका राही
चला जाये सपनोसे आगे कहां
जिंदगी ......
जीवन जगणे सार्थ कधी
अन स्वप्न भासते कधी कधी
स्वप्नांच्या या दुनियेमधुनी
जाती स्वप्नापार कधी
कधी जीवंत भासणारं हेच जग कधी स्वप्नवत भासत आणि आज जे समोर दिसतय ते स्वप्नांच्याही पलीकडे म्हणजेच भौतिका पलीकडे कधी जाईल सांगता येणार नाही. किती सोप्या भाषेत किती मोठं तत्वज्ञान मांडलय.
आणि
दुसऱ्या कडव्यात लिहितात
जिन्होंने सजाये यहां मेले
सुखदुःख संगसंग झेले
वही चुनकर खामोशी
यूँ चले जायें अकेले कहां
जिंदगी ......
तर्हेतर्हेचे रंग लुटुनिया
सुखदुःखाना झेलुनिया
कधी हरवले वाटेवर ते
एकटेच स्वर होऊनिया
पहिल्या कडव्याला पुढे नेत गुलज़ार जीवनाची निराशा वा वास्तव बाजू प्रखरतेने मांडतात दुसऱ्या कडव्यात. ज्यानी या जगात रंग भरले अनेक गोष्टी निर्माण केल्यात, सुख आणि दुःख दोन्हींचा सामना केलाय समर्थपणे , तेच एक दिवस अचानक शांत होऊन या समृद्ध जीवनाचा , जगताचा निरोप घेते झालेत. सर्वात श्रेष्ठ कोण जीवन की हे सर्व संपवणारा मृत्यु. किती योग्य, किती यथार्थ
मला वाटत बाह्य जगाला भासणारा आनंद प्रत्यक्ष आत, मनात खुप धीर गंभीर आहे आणि जीवनाची वास्तविकता पूर्णपणे ओळखलेला असा एक सज्ञानी , संयत, सर्व स्विकारून सुद्धा जीवनाच्या या उदास बाजूबद्दल तटस्थपणे वेगळ मत मांडून , त्यावर आपल्याला विचार करायला लावणारा आहे. म्हणजेच जीवन जगताना या वास्तविकतेच भान असेल तर खुपसे ईगो, ईर्षा, वाद संपून जीवन अधिक सफल, परिपूर्ण, शांत आणि संयत होईल.
यात अजुन एक गोष्ट म्हणजे हे सर्व जे दिग्दर्शकाला , लेखकाला अपेक्षित आहे आणि आनंदच जे व्यक्तित्व आहे त्याच्या गूढ , पण सखोल परिक्षणाची यथायोग्य मांडणी गुलज़ार किती सहज सोप्प्या शब्दात मांडतात. अगदी समर्पक शैलित.
क्षणिक सुख, क्षणिक दुःख असलेल्या या क्षणभंगुर जीवनाच्या वास्तविकतेच भान ठेवून सुद्धा आनंद सारख आनंदी ,मनसोक्त आणि निखळ आयुष्य जे कदाचित काही क्षणांच आहे , ते तितक्याच ताकदिने आणि आपल्या सोबत असलेल्या सर्वानाच आनंदी ठेवून समर्थपणे जगता येत.
हेच आनंदच्या व्यक्तिमत्वाच सार. जीवनाच न उलगडलेल कोड गुलजार आणि आनंद मिळून सोप्प्या परिभाषेत सार्थपणे सांगतात.
सदा आनंदी
© प्रसन्न आठवले
०१/०१/२०१८
Comments
Post a Comment