ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ६
भरताचा हा विलाप चालू असताना , महालात जो तो स्वागताच्या तयारीला लागला होता. समूर्ण अयोध्या आणि प्रजाजन १४ वर्षान्च्या प्रदीर्घ दुःस्वप्नातून बाहेर येऊन, सारी मरगळ झटकुन, जागी झालेली होती.
त्याच वेळी राजा जनकाच्या मिथिलानगरीतसुद्धा लगबग आणि उत्साह वाढलाय . कारण अयोध्येहुन आमंत्रणाची तबके आलेली होती. स्वतः मंत्री सुमंत हे सर्व घेऊन आले होते. आणि त्यांचा निरोप सुद्धा तसाच होता. राजा जनक आणि राणी याना लगोलग आयोध्येला घेऊन येणे, प्रभुंच्या आगमन आणि राज्याभिषेक सोहळया नन्तरच परत मिथिलेस प्रस्थान ठेवा असा आग्रहाचा विडा घेऊन सुमंत आले होते, नव्हे घेऊन जाण्यास आले होते.
राजा जनक एक संत पृरुष होते. फक्त आणि फक्त प्रजाहित हेच एक ध्येय. पण तरीही रणांगणावर प्रचंड पराक्रमी अशी सुद्धा त्यांची ख्याति होती. पण तेसुद्धा १४ वर्षानपुर्वी घडलेल्या घटनाक्रमाने स्तंभित आणि काहीसे गर्भगळीत झाले होते. पण त्या काळातील प्रथेनुसार एकदा कन्या वरुन सासरी पाठवली की तीच सुख दुःख सर्व सासरीच या न्यायाने त्यानी त्यात जास्त लक्ष न घालता सर्व बाबी अयोध्येवर सोपवल्या होत्या. आणि ते त्या यथासांग पार पाडतील याचा त्याना पूर्ण विश्वास होता.
पण तरीसुद्धा एक पिता म्हणून मनात कुठेतरी विषण्णता जाणवत असे. कधीतरी उर भरून येत असे. आठवून काळजाच पाणी पाणी होत असे. मनात विचारांच काहूर थैमान घाले आणि मग जनक राजा स्वतःला प्रश्न विचारत की मी इतका देव भोळा, निष्ठावान, प्रजाहितदक्ष , पापभीरु, स्वप्नात सुद्धा कधी पाप न केलेला साधा सज्जन माणूस, आणि माझ्याच बाबत अस का व्हाव. का हे अकल्पित आणि अगणित भोग माझ्या तीन कन्यांच्या वाट्याला यावेत.
जानकी तर पतिसमवेत आहे वा जाताना पतिसमवेत गेली. पण उर्मिलेच आणि मांडवीच दुःख अनन्यसाधारण आणि कल्पनातीत आहे. अश्याच अलौकिक सामर्थ्याच्या आहेत या दोघी. उर्मिलेच दुःख पतिवियोग आहे म्हणून आपोआप दिसतय ,जाणवतय, पण मांडवी. तिचा पति म्हणजे राजपुत्र भरत रामावरील प्रेमामुळे, आईवरील अतीव रागामुळे आणि बंधु म्हणून असलेल्या कर्तव्यामुळे वनात जाऊन एक तपस्वी जीवन जगुन , प्रभुरामाच्या राज्याचा सेवक म्हणून आणि आईच्या कर्माच प्रायश्चित्त म्हणून एक व्रतस्थ जीवन जगतोय.
या सर्व आदर्शाचा मला सार्थ अभिमान आहे की रघुकुलाची रीत आणि वचन जपण्यासाठी आपापली कर्तव्य पूर्ण निष्ठेने आणि सामर्थ्याने पार पाडत आहेत आणि पार पाडतील यात अणुमात्र शंका नाहीये. आणि या सर्व वाटेवर कितीही खड़तर वाटचाल असली तरीही माझ्या चारही कन्या सार्थपणे आणि समर्थपणे आजन्म , विनातक्रार, आणि अतुलनीय अशी साथ देतील हे सुनिश्चित. मला आठवतय आणि अभिमानाने छाती भरून येते आठवल तरी, १४ वर्षांपूर्वी उर्मिलेला काही दिवस माहेरी घेऊन जाण्यासाठी निरोप आला. अर्थात माता कौसल्या यानी तो काळजीपोटी पाठवलाय हे माहित होत, म्हणून आपण तशी व्यवस्था करत होतो. पण उर्मिलेने उलट निरोप पाठवाल, की सासरी इतका दुर्धर प्रसंग आला असताना पिताश्री आपण विचार तरी कसा केलात की मी माहेरी येईन म्हणून .
वा उर्मिले वा सार्थ केलेस या घरण्याचे संस्कार. मला अभिमान आहे साऱ्यांचा माझ्या कन्यका आणि रघुकुलातील राजमंडळी आणि प्रजाजन सुद्धा.
अचानक राणी कडून निरोपघेऊन सेविका येते, "महाराज राणी आपलीच प्रतीक्षा करत आहेत"
आणि राजा जनक अचानक भानावर येतात. आणि लगबगिने म्हणतात चला आम्ही सिद्ध आहोत प्रस्थानाला
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
०३/१२/२०१७
जय श्रीराम
Comments
Post a Comment