यज्ञ
मुळात यज्ञ हा शब्द यज या धातूपासून उत्पन्न झाला. यज म्हणजे पुजणे किंवा संयुक्त होणे किंवा संगतीत येणे, संग जडणे,जोडणे इत्यादी. ज्ञ या शब्दात जाणणे, ज्ञात होणे, जाणीव होणे, उमजणे इत्यादी अर्थ अभिप्रेत होतात. म्हणजेच जाणीवेच्या उत्पत्तीतून, एखाद्या विचाराने संकल्प करून, समिधारुपात इच्छा, आकांक्षा, कर्म, ज्ञान, भक्ती इत्यादी, एकाद्या देवतेच्या चरणी वाहिल्या की तो यज्ञ स्वरूप होतो.
आता यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, एखादी गोष्ट, विचार, कर्म, कृती, उच्चार, आचार आपण जाणीवेतून वा ज्ञात असताना करतो ते ते सर्व यज्ञ आहेत. म्हणजे आपण करत असलेले प्रत्येक कर्म हे, यज्ञाच्या व्याख्येत बसते. म्हणजे आपण बुद्धी, काया, वाचा, मन आणि सर्व कर्मेंद्रिय यांनी केलेली एक न एक कृती ही यज्ञरूप आहे.
पण यज्ञात मुख्य गोष्ट असते ती म्हणजे यज्ञ देवता. इथे आपली कामना, वासना हीच त्या यज्ञातील देवता आहे वा असते. त्या देवतेला समिधा रुपात संकल्प, इच्छा, वासना आणि त्यामागील उद्देश आणि भौतिक स्वरूपा तील पदार्थ वाहून, तिची मनाने प्रार्थना केली जाते. या भोग स्वरूप वाहिलेल्या वस्तूंच्या माध्यमातून, यज्ञ देवतेला, काही मागणं, हे संकल्प रुपात केलं जातं. हे संकल्प कथित असे असतील किंवा सुप्त मनात योजले गेलेले असतील.
आता याचा विस्तार करून, थोडं सखोल चिंतन करूया. यज्ञ म्हणजे फक्त भौतिक स्वरूपात वाहिलेल्या वस्तूचं नव्हेत तर, त्यामागे मन, मनाची ऊर्जा, मनातील विचार, इच्छा, कामना हे देखील वाहिले जातात. याचाच अर्थ असा होतो की, आपण प्रत्येक क्षण एक एक यज्ञ करत असतो. म्हणजेच आता या यज्ञाचे ज्ञानयज्ञ, धर्मयज्ञ, भक्तीयज्ञ आणि कर्मयज्ञ असे प्रकार करता येतील.
यातील धर्मयज्ञ ज्ञानयज्ञ व भक्तीयज्ञ, सर्वचजण करतात असं नाही. पण कर्मयज्ञ हा या जगतातील प्रत्येक जीव करत असतो. प्रत्येक क्षण काया, वाचा, मन आणि बुद्धी रुपात, करत असतो. म्हणजेच आपण, मनात योजत असलेला प्रत्येक विचार, त्यामागचे भाव, संकल्प हे कर्म यज्ञ करत असतात. हे मन व बुद्धी यांनी केलेले यज्ञ आहेत.
आता यातून सापडलेलं मर्म ध्यानात घ्या. आपण करत असलेल्या विचारांमधील भाव, त्या मागील प्रेरणा, उर्जा, शक्ती हे सर्व, या यज्ञात आपण वाहात असलेल्या समिधा आहेत. म्हणजेच जसे भाव, प्रेरणा, संकल्प, ऊर्जा आणि शक्ती तसच फलरुप यज्ञफल, आपल्या समोर, यज्ञ देवता आणून ठेवणार.
जर सर्व सकारात्मक, निर्दोष व शुद्ध असेल तर, यज्ञ देवते कडून प्राप्त होणारं फल, शुद्धच असणार. या विरुद्ध जर हे विचार, संकल्प, भाव, प्रेरणा, ऊर्जा व शक्ती दूषित, नकारात्मक, अशुद्ध, विकारयुक्त, विषय युक्त असतील तर, यज्ञ देवता आपल्याला प्रसाद रुपात त्या प्रत्येक कर्माचं फल त्याचं स्वरूपाचं देणार.
आपल्याला मनात, प्रत्येक क्षण येणारा विचार, हा पूर्ण शुद्ध, सात्विक व सकारात्मक भाव ठेवूनच, यज्ञ करणं, किती गरजेचं आणि हिताचं आहे, याचा प्रत्येकाने विचार करावा. आहे
जय श्रीराम!!
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
१०/११/२०२२
कार्तिक कृष्ण द्वितीया, शके १९४४.
Comments
Post a Comment