Skip to main content

कृपा वा अवकृपा

कृपा वा अवकृपा

खूपवेळा, नव्हे बरेच वेळा आपण हा शब्द सहज वापरतो. पण त्याचा नक्की शाब्दिक अर्थ, तात्विक अर्थ, मतीत अर्थ आणि गहन अर्थ, आपण पूर्ण ध्यानात न घेता, हा शब्द खूप सहज, वापरात आणतो. म्हणून आज या शब्दाचं सखोल चिंतन करूया. 

कृपा हा शब्द कृ + अपा या दोन शब्दांची संधी आहे. त्यांचा विग्रह केला तर त्याचे काय अर्थ होतात किंवा त्यातून काय अभिप्रेत होतं, ते जाणून घेऊया. कृ म्हणजे करणे. अर्थात कार्य करणे, कर्म करणे, क्रिया करणे इत्यादी. अपा म्हणजे अभिमान, अहंकार, गर्व, घमेंड इत्यादी. इथे अभिप्रेत असलेला अभिमान हा वृथा अभिमान असा असावा, असं मला वाटतं. कसं ते पुढे बघुया. 

आता हे दोन शब्द जोडून, कृपा हा जो शब्द तयार झाला, त्याचा अर्थ कशाप्रकारे घेता येईल, यावर विचार करता, खालील अर्थ ध्यानात येतात. वृथा अभिमान दूर करणे, अहंकार नष्ट करणे, गर्व खाली आणणे किंवा घमेंड दूर करणे.  म्हणजेच एखाद्याने आपल्याला आर्थिक वा अन्य प्रकारचे कोणतेही सहाय्य केले, तर कृपा झाली का. कारण, अश्या मदतीत, आपण त्याच्या उपकारात बद्ध होतो. म्हणजे एखाद्या न्युन भावात आपण जखडले जातो. 

जरी यदा कदाचित भविष्यात आपण त्या व्यक्तीचे ऋण, आर्थिक वा अन्य स्वरूपाचे, फेडले, तरीही त्या ऋणाच्या भावात मन कायमस्वरूपी बांधलं जातच. म्हणजे ती कृपा झाली का, तर नाही. ज्यामधे व्यावहारिक, सांसारिक, प्रापंचिक, भौतिक अथवा या जड जगताशी संबंधित कोणतेही सहाय्य, कोणाकडूनही झाले तर, ती कृपा नाही, तर ऋण झाले. उपकार सुद्धा नाहीत. कारण पुढे कळेल. 

कृपा या शब्दात जो गहन अर्थ दडलेला आहे, त्याकडे आता वळूया. कृपा म्हणजे अपार करुणेने केलेली अशी कृती, ज्यायोगे, कर्ता, सहाय्य स्वीकारणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही भौतिक, सांसारिक, प्रापंचिक बंधनात बांधत नाही. म्हणजेच कर्त्याच्या मनात, यातून कोणत्याही परत फेडीची, कोणतीही अपेक्षा असत नाही. कृपा म्हणजे हृदयातून येणाऱ्या करुणा भावात, विना अपेक्षा, केली गेलेली कृती. 

त्यात कृतीत, कर्ता, आपल्या कर्माचा, कोणताही लवलेश, हेतुत,मनात, कृतीत वा कार्यमागे ठेवत नाही, इच्छित नाही. कृपा ही करुणेच्या, स्नेहाच्या भावनेची पराकाष्ठा झाल्यावर, सहज घडलेली कृती. ज्यामुळे स्वीकार कर्ता, कोणत्याही ऋणात बद्ध होत नाही. निष्काम, निष्कलंक, निरपेक्ष भावात, अपार करुणा सागर दाटून आल्यावर, त्या भावात सहज घडलेली कृती. 

आता लक्षात येईल की, कृपा नक्की कधी घडते. आता अवकृपा म्हणजे काय. तर करुणा न येता, न केलेले सहाय्य. पण प्रत्यक्षात कृपा n करणे, यामागे, नक्कीच काही हेतू, उद्देश वा इच्छा दडलेली असू शकते. आता जशी कृपा ही सांसारिक, प्रापंचिक व भौतिक असतं नाही. त्याचप्रमाणे, अवकृपा सुद्धा या जगतातील कोणत्याही वस्तू बाबत असू शकत नाही. तर तो फार फार तर, व्यावहारिक नकार किंवा सहाय्य न करण्याचं कर्म असू शकेल. 
एक सहज गोष्ट यातून ध्यानात येईल, ज्यांना निरपेक्ष सहाय्य करायचं असतं अश्या काही व्यक्ती म्हणजे ईश्वर, सद्गुरू वा गुरुजन आणि आई. या व्यतिरिक्त बाकीचं हे सांसारिक, प्रापंचिक व भौतिक सहाय्य आणि सहाय्य कर्ते. कृपा ही मात्र या तीन जणांकडून होते वा होऊ शकते. कारण या तिघांचे सहाय्य हे अपार करुणेने वा त्या भावतून प्रकट झालेले असते. 

यांचीच सदिच्छा प्रामाणिक व निरपेक्ष असते. आपली लौकिक उन्नत्ती व्हावी अशी अपेक्षा आई करते. त्यासाठी माता आपले ऐच्छिक बळ पूत्रापाठी लावते. या पेक्षाही उत्तम कृपा ही सद्गुरू आणि ईश्वर करतात. त्यांना या देहातील आत्मा आणि त्याचा विकास, प्रगती, सद्गती अपेक्षित असते आणि त्यासाठी जरुरी सहाय्य, या दोघांकडून, फक्त आणि फक्त करुणेपोटी प्राप्त होते. त्याच प्राप्तीला, कृपा म्हणून संबोधता येईल. त्या कृपेची प्राप्ती न होणे म्हणजे अवकृपा. जगतातील बाकी सर्व गोष्टी या हेतूप्रेरीत असतात. 

यावर अजून चिंतन करा. 
जय श्रीराम !! सद्गुरू चरण वंदन !! 

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
१२/११/२०२२

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...