पावसात लिहिलेलं मुक्त चिंतन ( ओढ )
मस्त बरसणारा पाऊस. अवनीकडे धावणारे त्याचे ते आरक्त हात, धरणीला आपल्या कवेत घ्यायला उत्सुक. प्रत्येक थेंब अन थेंब थबकत, थिरकत, लयीत निघालाय मेघाचा निरोप घेऊन , पुनः प्रतिवर्षीप्रमाणे. उनाड काही थेंब उगाच खेळतात झाडाशी, पानांशी, फुलांशी आणि गवताच्या प्रत्येक पात्याशी, मुद्दाम उशीर करत धरणीवर पोहोचायला.
निखळ आणि निष्पाप नात आहे या मेघांचं वसुंधरेशी. मुळात ते तरी कुठे स्वतःहून येतात भेटीला. ग्रीष्मात तप्त झालेल्या धारित्रीला उष्णता सहन न होऊन तीच चातका प्रमाणे वाट बघत होती. किती उसासे टाकावेत तिने किती धारा काढाव्यात घामाच्या तिने. बर हा उष्मांसुद्धा मुद्दाम सर्व निरोप मेघांपर्यंत पोचवण्याच्या गडबडीत किती उतावीळ झालाय.
धारित्रीला तिचा निरोप नीट सांगायच्या आतच वाफेसह वर आकाशात लुप्त होतोय. पुन्हा तोच तोच निरोप किती वेळा द्यावा लागतोय त्या धारित्रीला. अखंड आवाहन मेघांना येण्याचं आणि अखंड त्या निरोपाची अदलाबदल. अदला बदल या साठी की वाफेसह वर गेलेला निरोप रावीराजाचे सैनिक तो वाटेतच गुडूप करण्याचा खेळ अनिर्बंध चालवत आहेत.
पण उष्णतादेखील न थकता पुन्हा पुन्हा हे निरोप घेऊन जाण्याचा आपला उपक्रम, अविरत अडीच तीन महिने, सुरूच ठेवतो. इकडे मेघांना यायला उशीर होतोय म्हणून धरा अजूनच कासावीस होत आहे. बिचारीच्या जीवात जीव नाही. साहजिक आहे आठ महिने प्रतीक्षा केली आहे तिने, या मेघांची. त्यात आता अजून उशीर म्हणजे अधीर जीवाला या किती बर थोपवून ठेवायचं.
या जिवाच्या तगमगीला काही अंत आहे की नाही. किती आर्जव त्या प्रियकराचे, किती विनवण्या त्याच्या येण्या साठी. बर इतकं करूनही , तो कधी येईल, कधी भेटेल याचं काही गणित नाहीच. त्यातून आलाच तर वेळेत नाहीच , हे हल्ली नेहमीचं झालंय.
या सर्व काळज्या, विनवण्या, विनंत्या, आर्जव, उसासे, निरोप या सर्वातून योग्य परिणाम साधला गेला आणि एकदाचा आपला डौल दाखवत, वाजत गाजत मेघाचा प्रवेश वसुंधरेच्या परिघात झाला, मात्र तीचं काळीज थरथरलं, रोमांचित तनुवर शहारे आले, फक्त कल्पनेने की दूरवर माझा सखा, प्राण, साथीदार दिसतोय आता तो नक्की येऊन मुक्त आलिंगन देऊन तृषार्त कायेला तृप्त करून बेहोष करून टाकेल.
अश्या बेधुंद मुक्त उन्मादाचा आनंद म्हणजेच मेघातून निघालेले पावसाचे थेंब आणि त्यांचं अफाट वेगात धरेला कवटाळून घेणं आणि त्या मिलनाचा सुंदर आविष्कार म्हणजेच नंतर श्रावणात धारित्रीचं हिरवं अहेव लेणं. जगण्याचा आनंद.
© कल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
२८/०६/२०१९
२०:०२
Comments
Post a Comment